भूखंड घोटाळ्याचे पालिकेत पडसाद
![Municipal employees who have graduated in Marathi language will get salary increase](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/bmc.jpg)
- सभागृहात विरोधकांची घोषणाबाजी
पोयसर आणि गोरेगाव येथील सहा भूखंडांचे श्रीखंड जमिन मालकाच्या घशात घालणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात सोमवारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष असे सगळेच पक्ष एकटवले. गली गली में शोर है, मामा लांडे चोर है. परत करा.परत करा. हडप केलेले सहा भूखंड परत करा. अशा घोषणा देत भाजपासह विरोधकांनी सभागृहात जोरदार आवाज उठवला. यावेळी शिवसेना नगरसेवकांनीही शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यामुळे पालिका सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.
पश्चिम उपनगरातील उद्यान, शाळा व रस्त्यासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता. पण सत्ताधारी शिवसेनेने सुधार समितीत याबाबतचे प्रस्ताव मंजूरीसाठी आले असता, ते दप्तरी दाखल केले. यावरून शिवसेनेला सभागृहात लक्ष्य करण्यात आले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवेदनाद्वारे पालिका सभागृहात सोमवारी चर्चेला तोंड फोडले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, शिवसेनेने पक्षाकरिता निधी जमा करण्यासाठी ३९ हजार चौरस मिटरचे भूखंडाचे श्रीखंड मालकांना देऊ केले, असा आरोप विरोधकांनी केला. यामुळे दोन हजार कोटी रुपयांचा भूखंड मालकांच्या ताब्यात जाणार आहे.
सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे विकासकाच्या भाषेत बोलत असल्याची टीका रवी राजा यांनी केली. सपाचे रईस शेख यांनी या आरोपांची री ओढत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून मुंबईतील एकही आरक्षित भूखंड हातातून जाऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्याच शिवसेनेने सहा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही शेख यांनी केला.
भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही यावेळी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेना आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याच्या बाजूने होती. त्यांची भूमिका अचानक कशी बदलली, असा प्रश्न त्यांनी केला. या पापात आम्ही वाटेकरी नसल्याचेही कोटक यांनी यावेळी स्पष्ट केले. यावर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. पण सहा भूखंडावर बोलणे टाळले.
श्रीखंड आणि विमान
पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव या शिवसेनेच्या नगरसेवकांना खिजविण्याकरिता श्रीखंड घेऊन आल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह विशाखा राऊत, शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वसराव यांनी विरोधकांच्या दिशेने धाव घेत, श्रीखंडाचा डब्बा हिसकावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर हे श्रीखंड राखी जाधव यांच्या तोंडाला फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तितक्यात भाजप नगरसेवकांनी उभे राहून ‘मामा लांडे चोर है.’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. यावेळी काही नगरसेवकांनी कागदी विमाने बनवून ती सभागृहात उडवली.