पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची निवड
मुंबई । प्रतिनिधी
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत 5 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा 9 जणांचा यात समावेश आहे.
यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांची ही या समितीत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पद्म पुरस्काराबद्दल माहिती
पद्म पुरस्कार हा भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक मानला जातो. दरवर्षी 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक असा या पुरस्काराचे स्वरुप आहे.
भारत सरकारने 1954 मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. यातील पद्म पुरस्कार हा तीन विभागात विभागून दिला जातो.