दिल्लीतील स्फोटानंतर अजित पवारांची गृहमंत्र्यांशी चर्चा, सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश
मुंबई – नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्लीतील या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आहे.दिल्लीतील या स्फोटानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.
राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2021
मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोबतच, राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.दरम्यान, इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर एक गाडी उभी होती आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.