‘दाभोलकर प्रकरण आताच्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनं दाबलंय’ – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/prakash-ambedkar_650x_2019060414465317.jpg)
मुंबई | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे झाल्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘सध्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंच दाभोलकर प्रकरण दाबलं आहे,’ असा संशय आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. आंबेडकरांचा नेमका रोख कुणाकडे आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
आंबेडकरांनी राज्यात सध्या असलेल्या सरकारमधील एका व्यक्तीवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘आज नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण होताहेत. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही, तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण, आम्हाला शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधीलच एका मोठ्या व्यक्तीनं हे प्रकरण त्याचवेळी दाबले होते.’
नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला गुरुवारी सात वर्षे झाली. त्यानिमित्तानं ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यात त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. तसंच, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. घोषणाही दिल्या. सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नेमकी कालच दाभोलकरांची आठवण काढत सीबीआयवर निशाणा साधला होता.
सुशांत प्रकरणाच्या तपासाची गत दाभोलकरांच्या चौकशीसारखी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी दाभोलकर प्रकरणावर एका मागोमाग एक ट्वीट केले आहेत.