…तर गरज पडल्यास भाजपमध्ये प्रवेश करु – बच्चू कडू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Kadu.jpg)
मुंबई | मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावरून राजकारण पेटले आहे. पंजाब, हरयाणा, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत शेतकरी कायद्यांना विरोध करत आहे. काँग्रेसकडूनही केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांवर टीका केली जात असतानाच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. “मोदीजी आपली ५६ इंचची छाती असेल, तर शेतकऱ्यांसाठी दोन ओळी कृषी विधयेकात टाका,” असे कडू यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली कृषी कायद्यांवरील भूमिका मांडली आहे. “कृषी कायद्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका भाजपसोबत असतानाही याच पद्धतीने होती. जिथं खरं होतं तिथं उभी राहिली. आमचं असं मत आहे की, बिलामध्ये दुरूस्ती करायला हवी. बिल जसंच्या तसं स्वीकारायला आम्ही तयार आहोत. मोदीजींची जर ५६ इंचची छाती असेल, तर ५६ इंच छाती स्वीकारतो.
फक्त दोन ओळी त्यात टाका की, ५० टक्के नफा धरून भाव काढू आणि ५० टक्के नफा धरून जो भाव निघेल तशी खरेदी करू. इतक्या दोन ओळी टाका. गरज पडल्यास आम्ही भाजपात प्रवेश करू,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.