डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी सोहळा पुढे ढकलला
मुंबई – मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारकाचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा पार पडणार होता. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. निमंत्रणाचा वाद, मुख्य नेत्यांची अनुपस्थिती यामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला, अशी चर्चा आहे.
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आंबेडकर चळवळीतील नेत्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण न दिल्याने वाद निर्माण झाला होता. या पायाभरणी सोहळ्यासाठी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं. यावर कोणाला बोलवायचं हा सर्वस्वी निर्णय सरकारचा असल्याचं वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सकाळी १० वाजता आनंदराज आंबेडकर यांना एमएमआरडीएने निमंत्रण दिलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही त्यावेळी उपस्थित होते. तर आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते.