टाटांच्या टीसीएसने अंबानींच्या रिलायन्सला पछाडले…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Reliance-Vs-Tata-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला मागील 12 वर्षांतील सर्वात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अंबानींना शेअर बाजाराने काल जोरदार धक्का दिला. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये 12.35 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. ही घसरण एवढी होती की, शेअर बाजारात झालेल्या 1900 अंकांच्या पडझडीपैकी 500 अंक एकट्या रिलायन्सचे होते. रिलायन्सचा शेअर 1105 रुपयांवर आला आहे. ही ऑक्टोबर 2008 नंतर झालेली मोठी घसरण आहे. यामुळे दोन महिन्यांपूर्वी 10 लाख कोटींवर असलेल्या रिलायन्सचे बाजारमूल्य 7.05 लाख कोटी रुपये एवढे झाले आहे. रिलायन्स शेअरधारकांना तब्बल 1.08 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
काल आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियाने रशियाला नामोहरम करण्यासाठी क्रूड ऑईलच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी केल्या. याचा परिणाम मुंबई बाजारातही पहायला मिळाला. तेल उत्पादनात असलेल्या रिलायन्सलाही याचा फटका बसला. काल दिवसभरात सेन्सेक्स 2400 अंकांची घसरण नोंदवत दिवसाच्या अखेरीला 1941 अंकांनी कोसळला. यामधील 500 अंक एकट्या रिलायन्सचे होते. या घसरणीमुळे रिलायन्स आता टीसीएसपेक्षाही खालच्या क्रमांकावर गेली आहे. टीसीएसचे बाजारमुल्य 7.40 लाख कोटी रुपये आहे.
सरकारी कंपनी ओएनजीसीचेही शेअर 16.26 टक्क्यांनी घसरले. तसेच बाजारमुल्यही 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. ओएनजीसीचे बाजार मुल्य 93000 कोटी रुपये झाले आहे. कोरोना व्हायरस आणि येस बँकेमुळे सोमवारी शेअर बाजारामध्येही घसरण झाली. गुंतवणूकदारांमध्ये असंतोष असूनही येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. बीएसई वर येस बँकेचा शेअर 32 टक्क्यांनी वाढून 21.30 रुपये झाला. शुक्रवारी बीएसईवर येस बँकेचे शेअर्स 16.20 रुपयांवर बंद झाले. ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित असल्याच्या सरकारच्या आश्वासनामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत आला आहे. पण येस बँकेला वाचवण्यासाठी धावलेल्या देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या समभागाच्या किंमतीत घट झाली. सोमवारी एसबीआयचे शेअर्स 5.60 टक्क्यांनी घसरून 254 रुपयांवर गेले. शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स बीएसईवर 260 रुपयांवर बंद झाले आहे.