ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळं वाकडंच दिसते; जितेंद्र आव्हाडांचा अमित शहांवर निशाणा
मुंबई – कोकणच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. हे सरकार तीन चाकी असल्याची टीका करतानाच, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला कोणताच शब्द दिला नव्हता, असाही दावा त्यांनी केला होता. शहांच्या या टीकेला आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शहांवर निशाणा साधला आहे.
ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं. आम्हाला तीन चाकी सरकार म्हणाले, म्हणू द्या. तीन चाकी तर हेलिकॉप्टरही असते, असा जोरदार टोला आव्हाडांनी अमित शहांना लगावला आहे.
देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य करताना ते म्हणाले की, हा देश दांडुक्यांना, लाठ्याकाठ्यांना घाबरत नाही. देशात क्रांती घडेल. तेव्हाच देश शांत बसेल. सरकारने लोकशाहीचं तंत्रं वापरावं, चर्चा करावी. तसेच, शरद पवारांनी कृषी कायद्यावरून कोणताही यू-टर्न घेतला नसल्याचे देखील ते म्हणाले.
अमित शहांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे कोणतेही वचन दिले नव्हते, असा दावा केला होता. याविषयी बोलताना आव्हाड म्हणाले की, बंद खोलीचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनाच माहीत. तिसऱ्या व्यक्तिला त्याची माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.