कोरोनाबाबत समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पाठवणाऱ्यावंर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-59.png)
जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून, या विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम विभागाला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत केले.
यासंदर्भात विधान परिषदेत सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, राज्य शासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या ५५१ आंतरराष्ट्रीय विमानातील ६५ हजार १२१ प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून ४०१ प्रवासी आले असून आतापर्यंत १५२ प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी १४९ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी १४३ जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण रुग्णालयात दाखल असून, पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-17.png)
महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ३० जहाजांमधील ६७६ प्रवाशांची तपासणी केली त्यात संशयित रुग्ण आढळून आला नाही. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीनसह १२ देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आता मात्र सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला स्वघोषणापत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेची करण्यात आली आहे.