केंद्राप्रमाणे राज्यानेही आर्थिक पॅकेज जाहीर करावं – विरोधी पक्षनेते
मुंबई | करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांपासून बाराबलुतेदारांवर मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. इतर राज्यांनीही त्या त्या राज्यात आर्थिक पॅकेज दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणतंही पॅकेज जाहीर केलेलं नाही. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ही मागणी केली. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून आहे. त्याच्या खरेदीची व्यवस्था राज्य सरकारने केलेली नाही. शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने पैसे देऊनही राज्य सरकारने हा माल खरेदी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. तसेच खरीप हंगाम असतानाही बी बियाणे आणि खतांचीही कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
हाताला काम नसल्याने बाराबुलतेदारांवरही मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या बाराबलुतेदारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.