‘करोना विषाणू’ला रोखण्यासाठी मुंबई मेट्रोचं महत्त्वाचं पाऊल…
मुंबई | महाईन्यूज |
जगभरात थैमान घालणाऱ्या ‘करोना विषाणू’ला रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि विविध रुग्णालये, संस्थांनी पुढाकार घेतला असतानाच, मुंबई मेट्रोनं खबरदारी म्हणून आवश्यक ती पावलं उचलली आहेत. राऊंड ट्रीपनंतर सर्व मेट्रो ट्रेन स्वच्छ केल्या जाणार आहेत. तसंच रेल्वे स्थानकांवरही स्वच्छता केली जाणार आहे. दररोज रात्री स्थानकांवर स्वच्छता केली जाणार आहे. तिकीट खिडक्या, लिफ्ट आणि एस्केलेटर आणि रेलिंगचीही साफसफाई करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांतील स्वच्छतागृहे दररोज स्वच्छ केली जातातच, पण आता स्वच्छतागृहांमध्ये साफसफाई करण्यासाठी मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
जगभरातील अनेक देश करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तीन हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या करोना व्हायरसनं भारतातही शिरकाव केला आहे. भारतातही तीसहून अधिक जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. या करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार, तसंच महाराष्ट्र सरकारसह देशातील सर्व राज्ये, आरोग्य केंद्रे, सामाजिक संघटना, विविध संस्था विविध उपाययोजना आणि खबरदारी घेत आहेत. त्यात आता मुंबई मेट्रो रेल्वेनंही करोनाला रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनानं खबरदारी म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत.