” उपचारासाठी वसईतून मुंबईत जाणाऱ्या रुग्णांना लोकलप्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी “
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य गंभीर स्वरूपाच्या व्याधींवर उपचारासाठी वसईतून मुंबईत जाणाऱ्या रुग्णांची प्रवासाची अडचण लक्षात घेता त्यांनादेखील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.
कोरोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळे लोकल ट्रेनदेखील बंद करण्यात आल्या. मात्र आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया हळुहळू सुरू झाली असताना लोकल ट्रेन या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे अन्य नागरिकांना मुंबई भागात जायचे असल्यास एसटी अथवा खासगी वाहनांचा वापर करावा लागतोय. अशा परिस्थितीत गंभीर आजाराच्या रुग्णाला तातडीने मुंबईतील रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्यास त्याला मुंबईत जाण्यास अडचण निर्माण होत आहे.
वसई-विरारमधील अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून महिन्याकाठी अथवा आठवड्याला त्यांना मुंबईला जावे लागते. मात्र वाहतूकसुविधा अपुरी असून खासगी सेवेचा अधिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. यासाठी त्यांची अडचण लक्षात घेता या गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि मुंबईला उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना लोकलमध्ये प्रवेश देण्याची मागणी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी पंतप्रधानांसह रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.