आरबीआयचे पतधोरण जाहीर; रेपो, रिव्हर्स रेपोचे दर कायम
![Another bank in Maharashtra gets its license revoked by RBI](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/RBI.jpg)
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पतधोरणात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परिणामी व्याजाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे खरीपाची चांगली पेरणी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर दास यांची पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी रेपो रेट तसाच म्हणजे ४ टक्केच ठेवला असून रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्के कायम ठेवला आहे. या वर्षात आतापर्यंत आरबीआयने दोन वेळा रेपो दरात १.१५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे यावेळी त्यात कोणताही बदल केलेला नाही. कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थाही सुटलेली नाही. उत्पादन आणि सेवा क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाच्या संकट काळातही बँक कर्मचाऱ्यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे दास यांनी सांगितले. महागाई एवढ्यात कमी होण्याची शक्यता नाही. अन्नधान्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने मार्चमध्ये असलेला महागाईचा दर ५.८४ टक्क्यावरून जूनमध्ये ६.०९ टक्क्यांवर गेला, असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे पहिल्या सामाहित अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचेही त्यांनी सांगितले.