आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे
मुंबई | महाईन्यूज
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात आंदोलकांची रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन तासांनी आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जेएनयू हल्ल्याविरोधात सुरू असलेल्या आझाद मैदानातील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. ‘गेटवेवर आम्ही कुणालाही त्रास न देता आंदोलन करत असतानाही पोलिसांनी आम्हाला आझाद मैदानात आणलं आहे. हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवलेलं आहे. गेटवेवरील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, पण आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहील’ अशी माहिती आंदोलक विद्यार्थी कपिल अग्रवाल याने दिलेली आहे.
गेटवे परिसरात जेएनयू हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली होती. मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून होते. परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली होती. आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केलेला होता. गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं नाही, आझाद मैदानात त्यांची रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.