राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय त्याला सरकारचं पाठबळ तर नाही ना? जरांगे पाटलांचा सवाल

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय त्याला सरकारचं पाठबळ तर नाही ना? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा दोन वेळा मान राखला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही त्यांना २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आम्हाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण हवं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की, आम्ही शांततेची बाजू मांडतोय. परंतु, बाकीच्या लोकांना राज्यात दंगल भडकावी असं वाटतंय. आम्ही शांततेचं आव्हान करतोय. हे चुकीचं आहे का?
हेही वाचा – ‘पुढचे ६ महिने माझ्यासाठी क्रिकेट खेळू नको’; शमीला लग्नाची मागणी करणाऱ्या अभिनेत्रीची नवी पोस्ट
रात्र-दिवस हे प्रशासन अलर्ट असतं. मोर्चे, यात्रा, रॅली, सभा हे सगळं दिवसरात्र चालू असतं. क्रिकेटही रात्रीचं चालू असतं. त्यामुळे आम्हीदेखील रात्र-दिवस लोकांकडे जातोय. आम्ही शांततेची बाजू मांडतोय. आम्ही सरकारची बाजू मांडतोय. राज्यात शांतता नांदावी असा प्रयत्न करतोय. परंतु, काहींना वाटतंय की राज्यात दंगली व्हायला हव्यात. परंतु, आमची शांततेची भूमिका असूनही आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर आम्हीदेखील शांततेसाठीच प्रयत्न करत आहोत, तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. तुम्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना खतपाणी घालताय का? राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय, जो समाजांमध्ये तेढ निर्माण करतोय त्याला या सरकारचं पाठबळ तर नाही ना? राज्य सरकारला राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का? असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला.