राज्यात कोरोना चौथी लाट येणार का? राजेश टोपे म्हणाले…
![Will there be a fourth wave of Corona in the state? Rajesh Tope said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Rajesh-Tope.jpg)
जालना | केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून सतर्क केलं आहे. कोरोना संपला असा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये, सर्व राज्यांनी सावध राहावे आणि पंचसूत्रीचं पालन करावे. तसेच चाचणी, ट्रेसिंग, उपचार, संपूर्ण लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजना अवलंबण्यास राजेश भूषण यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातील राज्य सरकार केंद्राच्या अनुषंगाने कार्यवाही करत राहील, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे संपूर्ण जगात पुन्हा चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. तसंच चीनमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आले आहे. अशातच देशात कोरोनाची चौथी लाट येणार का असा प्रश्न उपस्थित होतो. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यामध्ये बोलताना म्हणाले की, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढच्याला ठेच, मागचा सावध या पद्धतीने आपल्या राज्यात सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्याला आलेलं आहे. हे पत्र जिल्ह्यांच्या कलेक्टरकडे पाठवण्यात आलं आहे. या पत्रानुसार जिल्ह्यांमध्ये योग्य ती कार्यवाही केली जाईल.