वतन इनामी जमिनीचा प्रश्न सोडवा अन्यथा स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार घालू : तानसेनभाई ननावरे
खेड, मावळ येथील महसूल अधिकारी व पोलीस प्रशासनावर वतनदारांचे गंभीर आरोप
![वतन इनामी जमिनीचा प्रश्न सोडवा अन्यथा स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार घालू : तानसेनभाई ननावरे खेड, मावळ येथील महसूल अधिकारी व पोलीस प्रशासनावर वतनदारांचे गंभीर आरोप Vatana ināmī jaminīcā praśna sōḍavā an'yathā svātantrya dināvara bahiṣkāra ghālū: Tānasēnabhā'ī nanāvarē khēḍa, māvaḷa yēthīla mahasūla adhikārī va pōlīsa praśāsanāvara vatanadārān̄cē gambhīra ārōpa Resolve Vatan Inami land issue or we will boycott Independence Day: Tansenbhai Nanavare](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Tansen-780x470.jpg)
पिंपरी : वतन जमिनीच्या विषयाकडे कोणतेही सरकार प्रामाणिकपणे पाहत नाही. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण करण्यास पायबंद घातला. त्याचप्रमाणे महार वतन जमिनी बाबतही कायदा करून कडक अंमलबजावणी केली पाहिजे. महार वतनप्रमाणेच रामोशी समाजाच्या नागरिकांवर देखील अन्याय केला जात आहे. त्यामुळेच दलित समाज भाजपापासून दूर गेला आहे. वतन इनामी जमीन हस्तांतरण बाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या स्वातंत्र्यदिना दिवशी निषेध करून स्वातंत्र्य दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करून बहिष्कार घालू असा इशारा ‘वतन इनामी जमिनी हस्तांतरण विरोधी कृती समिती’चे मुख्य मार्गदर्शक तानसेनभाई ननावरे यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
गुरुवारी (दि.२०) पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस यावेळी संयोजक सुधीर लक्ष्मण जगताप, वतन जमिनी धारक फुलाबाई मधुकर गायकवाड, रामचंद्र कृष्ण चव्हाण, संगीता सुनील चव्हाण, हिराबाई बाबुराव सोनवणे, सुनील लक्ष्मण जगताप आदींसह खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक, आळंदी, केळगाव, मावळ तालुक्यातील वडगाव सांगवी येथील वतनदार व त्यांचे वारसदार उपस्थित होते.
संयोजक सुधीर लक्ष्मण जगताप यांनी तालुका खेड, वाकी बुद्रुक येथील वतनदार फुलाबाई मधुकर गायकवाड, आळंदी केळगाव येथील महार वतनदार कै. गणा मारुती महार जगताप आणि वतनदार कै. बाबुराव धोंडू महार सोनवणे व धोंडू बाबू सोनवणे, बाबू धोंडू महार सोनवणे, मावळ तालुक्यातील वडगाव सांगवी येथील वतनदार लक्ष्मण रामा रामोशी चव्हाण व राधाबाई कृष्णा चव्हाण यांच्या वतन इनामी जमिनीवर विकसकांनी बेकायदेशीर ताबा मिळविला आहे याबाबत माहिती दिली. या बाबत संबंधित महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी, पोलिस अधिकारी, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी देऊन देखील न्याय मिळत नसल्याचे सांगितले. पोलीस व संबंधित अधिकारी निव्वळ जाबजबाब व सुनावणी घेऊन वेळ काढूपणाची भूमिका घेत आहेत असाही आरोप सुधीर जगताप यांनी केला.