सावधान! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे | अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत. हवामान खात्याने आज विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
हेही वाचा – शिवसेना-युवासेनेच्या वतीने वारकऱ्याना पाच हजार बॅगचे वाटप
याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. देशाच्या इतर भागातही मोसमी पावसाची प्रगती होत असून लवकरच मोसमी पाऊस देश व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.