कोकणात अवकाळी पाऊस; आंबा-काजूच्या बागांना धोका
![Unseasonal rains in Konkan; Danger to mango-cashew orchards](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Heavy-rain.jpg)
सिंधुदुर्ग | राज्यातील विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून आता कोकणातही अवकाळी पावसाने कूच केली आहे. बुधवार दुपारपासून कोकणातील विविध ठिकाणी पाऊस पडल्याने शतेकरी हवालदिल झाले आहेत. कारण अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांना धोका निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन धोक्यात आले होते. त्यातच आता मोहोर लागायच्या कालावधीतही अवकाळी पाऊस पडत असल्याने आंब्याच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने आधीच दिला होता. त्यानुसार, बुधवारी दुपारी सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या अर्ध्यातासात या पावसामुळे रस्त्यावर पाणी-पाणी झाले तर दुसरीकडे वाऱ्यामुळे आंबा गळतीचा धोका कायम आहे. आंबा उत्पादन शेवटच्या टप्प्यात असताना पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ढगाळ वातवारणामुळे द्राक्षांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. द्राक्षांचा दर्जा खालावल्याने अपेक्षित दर मिळत नसून आता पावसामुळे विक्रीही कमी झाली आहे.