समृद्धी महामार्गावर ब्लॉक; वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात गॅन्ट्री उभारणीसाठी वाहतूक बंद

बुलढाणा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत ‘गॅन्ट्री’ उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण ३५ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावरील कि.मी. १७८+९०० ते २९०+४०० दरम्यान वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या मार्गावर ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामासाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक तत्काळ सुरू करण्यात येईल. वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ही माहिती दिली.
हेही वाचा –मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात लागली पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी!
या कामामुळे महामार्गावरील मुंबई व नागपूर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर ठराविक वेळेत परिणाम होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गांवरून वरील कालावधीत जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. प्रवासाचे नियोजन करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध तारखांना रात्री १२ ते १ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत, मुंबई व नागपूर वाहिनीवर अनुक्रमे कि.मी. १७८.९००, १७९.७५०, १८३.७००, १८५.५००, १९०.४००, २००.४००, २०५.४००, २०८.२००, २०८.८५०, २३८.५५०, २४२.६००, २४५.४००, २५०.५००, २६०.४००, २६४.८००, २७०.४००, २८०.४००, २८१.४०० व २८३.९०० या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिस, महामार्ग प्रशासन व सूचना फलकांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




