“…. म्हणून हिंदी भाषा शिकली पाहिजे”; नव्या शैक्षणिक धोरणाबाबत फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे.
अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. जून महिन्यापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र या धोरणाला काहींकडून विरोध केला जात आहे. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे समर्थन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपण यापूर्वीच नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आहे. त्यामुळे यात कुठलेही नवीन निर्णय घेतलेले नाहीत. महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे. त्याचप्रमाणे देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय आहे. संपर्कसुत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी भाषा शिकली पाहिजे.”
हेही वाचा – ‘…तर बाळासाहेबांनी यांच्या बुडावरच लाथ घातली असती’; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
“कोणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल. अन्य कुठल्या भाषा शिकायच्या असतील तर इतर भाषा शिकण्यापासून कोणलाही मनाई नाही. सर्वांना मराठी आली पाहिजे. तसेच आपल्या देशातील इतर भाषासुद्धा आल्या पाहिजेत. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न केला आहे,” असे मत देवेंद्र फडवीसांनी व्यक्त केले.
दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पायाभूत स्तरासाठीचा आणि शालेय स्तरासाठीचा, असे दोन राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या आराखड्यांना मान्यता दिल्यानंतर शासनाने त्यावर शिक्कामोर्तब करत अंमलबजावणीची घोषणा केली आहे.
याबाबतच्या शासन निर्णयानुसार, आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नाहीत. त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी होईल. पहिले पाच वर्ष (3 वर्ष प्री प्रायमरी आणि क्लास पहिली, दुसरी) पायाभूत स्तर असणार आहे. त्यानंतर इयत्ता 3 ते 5 पर्यंत पूर्वतयारी स्तर असणार आहे. पूर्व माध्यमिक स्तर: वय 11 ते 14 (इयत्ता सहावी, सातवी व आठवी) माध्यमिक स्तर : वय 14 ते 18 (इयत्ता नववी ते बारावी) असा शैक्षणिक आकृतिबंध असणार आहे.