पंढरीतील पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू
पंढरपूर |
आषाढी वारीसाठी आलेल्या मानाच्या संतांच्या पादुकांचा गोपाळकाला आणि सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन आज परतीचा प्रवास सुरू झाला. पंढरीतून मार्गस्थ होताना सर्व संतांच्या पालख्या असणाऱ्या एसटी बसला फुलांनी सजविलेल्या होत्या. हेची दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा अशी आर्त विनवणी करीत संतांच्या पालख्या मुक्कामी परतल्या. करोनाच्या पाश्र्वाभूमीवर याही वारीवर सरकारने निर्बंध घातले. मात्र यंदा मानाच्या पालख्यांबरोबर भाविकांची संख्या दुप्पट म्हणजेच ४० केली तर पंढरीतील मुक्काम गेल्या वर्षी दोन दिवस होता तो यंदा १९ जुलै ते २४ जुलै पर्यंत वाढवला.
मोजक्याच भाविकांसमवेत आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाला. शनिवारी पहाटेपासून मानाच्या पालख्या गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी जमा झाल्या. टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पालख्या दाखल झाल्या. काल्याचे कीर्तन झाले, दही काल्याचे वाटप करून गोपाळकाला गोड झाला. शेकडो वर्षाची परंपरा जोपासल्याचे समाधान भाविकांतून दिसून आले. त्यानंतर मानाच्या पालख्या आणि मोजक्याच भाविकांनी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतले. या वेळी पालाखी प्रमुख, प्रमुख मानकरी यांचा सत्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केला. या नंतर मानाच्या पालख्या पंढरीतील मठात विसावल्या. या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारच्या सुमारास आकर्षक फुलांनी सजविलेल्या एस.टी.बस मधून पालख्या आणि भाविक विराजमान झाले. करोनाचे संकट दूरू होऊ दे आणि पुढील वारी भाविकांसह संपन्न होऊ दे अशी विनवणी सावळ्या विठुरायाचरणी करीत पंढरीचा जड अंत:करणाने निरोप घेतला.