तौक्ते चक्रीवादळाने घेतला वेग; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, विजपुरवठाही खंडीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/storm-rain-thunder-e1621215137380.jpg)
रत्नागिरी – तौक्ते चक्रीवादळाने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून रत्नागिरीत या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात गती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात वेग घेतल्याने किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे राजापूर तालुक्यातील 652 कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. दरम्यान, ताशी 130 मैलांपर्यंत वाऱ्याचा वेग वाढल्याने झाडांच्या फांद्या तुटून तसेच झाड उन्मळून विजेच्या खांबावर पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.
काल दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान या चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला आणि त्यानंतर वाऱ्याने मोठ्या प्रमाणात वेग घेतला. यामध्ये आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला असून दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील वीज पुरवठा अजूनही खंडीतच असल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली.
या चक्रीवादळामुळे गोव्यामध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाड उन्मळून पडल्याने झाला आहे. तर दुसऱ्याचा विजेचा खांब अंगावर पडल्याने झाला आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका रत्नागिरी तालुक्याला बसला असून तालुक्यातील 104 गावातील जवळपास एक हजार घरांची पडझड झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहेत.