आषाढी पालखी सोहळ्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी आळंदीतून होणार प्रस्थान
आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण
Ashadhi Wari : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागलेली असते त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येत्या ११ जूनला आळंदीतून प्रस्थान करणार आहे. ही पालखी पंढरपुरात २९ जूनला दाखल होणार आहे.
तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तसेच २८ जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होईल. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली आहे.
संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात. मागील वर्षी कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर पारंपरीक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली होती. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच या पालखी सोहळ्यात वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.