पुण्याहून गोव्याला निघालेल्या बसने रस्त्यातच घेतला पेट, ३७ प्रवासी थोडक्यात बचावले; बस जळून खाक
![पुण्याहून गोव्याला निघालेल्या बसने रस्त्यातच घेतला पेट, ३७ प्रवासी थोडक्यात बचावले; बस जळून खाक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Sindhudurg-Bus-Fire.jpg)
पुणे |
पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. ही घटना आज गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मनिष ट्रॅव्हल्स (नं. जीए ०३/डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली असता बसने अचानक पेट घेतला.
चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. या बसमधील प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले व बसने मोठा पेट घेतला. या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली. महामार्ग विभागाचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब दाखल झाला व आग विझवण्यात आली. या घटनेनंतर वैभववाडी एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता अडकलेली वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.