दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री
![Varsha Gaikwad on the committee for the Uttar Pradesh Assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/varsha-gaikvad.jpg)
- परीक्षा ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होणार
- परीक्षेसाठी जादा अर्धा तास वेळ देण्यात येणार
- लेखी परीक्षेनंतर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा असाईनमेंट पद्धतीने होणार
मुंबई – दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तर दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा :-खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती, सरकारचा आदेश
शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी ११ वाजता ऐवजी १०.३० वाजता सुरू होणार आहेत. मुलांचा यावर्षी लेखन सराव कमी झाल्यामुळे परीक्षेसाठी जादा अर्धा तास वेळ देण्यात येणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा एक तास वेळ देण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात येणार आहेत. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा असाईनमेंट पद्धतीने होणार आहे.
परीक्षा केंद्र हे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच असणार आहे. विद्यार्थ्याला कोरोना झाला असल्यास अथवा लॉकडाऊनमुळे परीक्षा देता न आलेल्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. तर पुरवणी पराक्षा जुलै- ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.