“भीमा कोरेगाव प्रकरणी काही दिवसातच शरद पवार…”; राष्ट्रवादी काँग्रेसने दिली माहिती
![“भीमा कोरेगाव प्रकरणी काही दिवसातच शरद पवार…”; राष्ट्रवादी काँग्रेसने दिली माहिती](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Sharad-pawar-2.jpg)
मुंबई |
येत्या काही दिवसात माझी बाजू मांडण्यासाठी आयोगासमोर येणार असल्याचे शरद पवारांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पवारांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविली आहे. त्यामुळे पवार नक्कीच आयोगासमोर हजर होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या प्रकरणात शरद पवार यांना सरकारच्या चौकशी आयोगासमोर आपली साक्ष नोंदवण्यास सांगितले आहे. या आधीही गेल्या वर्षी शरद पवार यांना आयोगाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
- शरद पवारांची साक्ष कशासाठी?
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. या प्रकरणी शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केले होते. या प्रकरणी अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने समन्स पाठवत शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यात सांगितले होते.
भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली.
- करोनावर नियंत्रण…
दोन वर्षानंतर कोरोनाबाबत दिलासादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचंही मलिक म्हणाले आहेत. राज्यात जवळपास ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी ते होम क्वॉरंटाईन आहेत. मुंबईत डबल डिजिट आकडा आला आहे. ही सगळी परिस्थिती पहाता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील असेही मलिक म्हणाले.