बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी पुणे सह देशभर आंदोलनाला सुरुवात
- आम्हाला हलक्यात घेऊ नका प्रश्न नसुटल्यास देशभर १५ कोटी ड्रायवर चक्काजाम करतील
- देशपातळीवर नेतृत्व सिद्ध झाल्याने बोगस रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीकडून वैयक्तिक पातळीवर टीका : बाबा कांबळे
पुणे / प्रतिनिधी
देशात संसदेचे व राज्यात विधानभवनाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या मध्ये रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर प्रामुख्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड सह रिक्षा चालकांचे राज्यासह देशव्यापी होणाऱ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधून घेणार असल्याचे ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगीतले तसेच देशपातळीवर रिक्षा संघटनांची एकी झाली आहे. माझ्यावर जबाबदारी दिली आहे. देशपातळीवर माझे नेतृत्व सिद्ध झाल्याने काही बोगस रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी देखील वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत. रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी माझ्यावर करण्यात येत असलेली टीका ही द्वेष भावनेतून होतेय हे रिक्षा चालक मालकांच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता मी रिक्षा चालक मालकांना व गोरगरीब कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देणार असेही बाबा कांबळे म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक, मालकांच्या विविध मागण्यांसाठी पुणे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र सह देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया वरती देशव्यापी रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट परवाना असलेल्या बस संघटनांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली आहे. पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रिक्षा चालक मालकांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या वेळी बाबा कांबळे रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा संयुक्त कृती समिती, रिक्षा टॅक्सी फेडरेशन वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष अनंद तांबे, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे विलास खेमसे, मोहम्मद शेख, बाळासाहेब ढवळे लक्ष्मण शेलार सोमनाथ कलाटे,हे उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्या
१) रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा.
२) रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.
३) मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा.
४) रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा.
५) मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा.
६) पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले
यावेळी बाबा कांबळे म्हणाले,गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यावर काही रिक्षा संघटनांचे बोगस प्रतिनिधी वैयक्तिक पातळीवर खालच्या स्तराला जाऊन टीका करत आहे. काही जणांना आपल्या वडिलांचा वारसा जपता आलेला नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेलो आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांच्या व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. देश पातळीवर रिक्षा चालक-मालकांची एकी करून मोठं संघटन उभे करण्यात यशस्वी पुढाकार घेतला आहे. त्याला यश देखील प्राप्त झाले. त्यामुळे सर्व रिक्षा चालक मालकांनी देशपातळीवरची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. मी केलेल्या कामाचे हे फळ असल्याचे मी समजतो. मात्र माझे नेतृत्व मोठे होत असल्याचे पाहून अनेकांना पोटशुळ निर्माण होत आहे. त्यामुळे रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. वास्तविक रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडवून न्याय देणे गरजेचे असताना देखील त्यांना संकटात टाकण्याची कामे बोगस संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. त्यांना रिक्षा चालक-मालक धडा शिकवतील, असेही बाबा कांबळे म्हणाले.