विद्यार्थी रिवेंज वॉरच्या विळख्यात, औरंगाबादेतील ‘या’ प्रकाराने पालक आणि पोलीस हैराण
![Parents and police harass students in 'Yaa' style in Aurangabad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Parents-and-police-harass-student.png)
औरंगाबाद | महाविद्यालय म्हटले की लगेच डोळ्यासमोर गजबलेली वर्ग, कॅम्पस मध्ये बागडणारे युवक, शिकणारी तरुण मुले आणि शिक्षणातील विद्यार्थ्यांमधील चढाओढ समोर येते. मात्र, औरंगाबाद येथे महाविद्यालयातील चित्र काही औरच आहे. शहरातील महाविद्यालयात सध्या अपहरण, गुंडशाही, रिवेंजचे वॉर सुरू आहेत. त्यामुळे मुले या ठिकाणी भविष्य घडविण्यासाठी जतात की मग गुंड बनण्यासाठी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असाच एक प्रकार ३ मे रोजी घडला.पहिल्यांदा एक तरुण तक्रारीसाठी पुढे आला आणि या प्रकरणाला वाचा फुटली.
प्रज्वल दत्तात्रय कोकणे वय १७ (रा.बेगमपुरा, औरंगाबाद) हा युवक सरस्वती भुवन महाविद्यालयात विज्ञान शाखेत ११वीचे शिक्षण घेत आहे. प्रज्वलला ३मे रोजी क्लास समोरून ८ ते १० युवकांनी चाकूचा धाक दाखवत अपहरण केले. व मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात नेले आणि तेथे अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. त्यानंतर तो घरी आला मात्र, त्याने कुणाला काहीही सांगितले नाही. दोन दिवसांनी त्याची तब्येत अचानकपणे खालावली. दोन्ही कानातून, नाकातून रक्त यायला लागले. रुग्णालयात नेताच त्याने पालकांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. सध्या प्रज्वलवर उपचार सुरू असून त्याच्या मेंदूवर देखील सूज आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात प्रज्वलने तक्रार केली आहे.
किशोरवयीन मुले विळख्यात का अडकत आहेत? रिवेंज म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. रिवेंज ही एक प्रकारची विकृत स्पर्धा आहे जी विद्यार्थी गटात सुरू असते. एका गटाने प्रतिस्पर्धी गटातिल विद्यर्थांचे शिकवणी क्लासेस, बाजारपेठ, कॉलेज किंवा दिसेल त्या ठिकाणाहून अपहरण करायचे व त्या विद्यार्थाला निर्जनस्थळी आणले जाते. ज्या गटाने अपहरण केले आहे.त्या गटातील सर्व सदस्य सर्व प्रथम अपहरण केलेल्या विद्यार्थाला अर्धनग्न करतात.व त्या नंतर बेदम मारहाण केली जाते. एवढ्यावरच हे प्रकरण संपत नाही तर त्या मुलांकडून माफी मागविली जाते. तो व्हिडिओ रिवेंज नावाने सोशल मीडिया अकाउंट वर ठेवला जातो. एक नंतर एक अपहरण आणि त्या नंतर व्हिडिओ पोस्ट ची शहरातिल महाविद्यालयात जणू चढाओढच सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र कुणीही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने हा गंभीर विषय समोर येत नाही.
अनेक तरुण या फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे एक प्रकारे संघटित गुन्हेगारीचाच हा प्रकार म्हणावा लागेलं. शिक्षणाच्या मंदिरात युवक गुन्हेगारीचे धडे घेत आहे.या कडे आता पालक, महाविद्यालय प्रशासनसह पोलिसांनी देखील गांभीर्याने पाहणे अत्यन्त गरजेचे झाले आहे.