आता रस्त्यावरील गुंड, मवाली थेट विधानभवनात; हर्षवर्धन सपकाळांची टीका

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल ते फक्त विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणीमारीच्या घटनेने…रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीसांनी पायश्चित म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यामध्ये सध्या विधीमंडळ आवारामध्ये झालेल्या हाणामारीवरुन वातावरण तापले आहे. या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सपकाळ म्हणाले, विधिमंडळ अथवा संसदेत जनता आपले लोकप्रतिनिधी पाठवते ती त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पण अलिकडे हे चित्र बदलत चालले असून महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी असे चित्र पाहिले जे आजपर्यंत या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले नाही. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले.
हेही वाचा – ISIS पद्धतीने हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांची मोठी कारवाई; सहा राज्यांमध्ये १० जणांना अटक
भाजपने ही नवी संस्कृती जाणीवपूर्वक आणली आहे. अक्कलकोटमध्ये प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या मकोकाच्या गुंडाला भाजपाचे नेतेच भिवू नकोस मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहे असे सांगत आहेत. तर आमदार निवासाच्या कँन्टीमध्येही एका आमदाराने असेच डब्ल्यूडब्ल्यूएफ केले. आका, कोयता गँग आता जुने झाले. आमदारांना मवाली म्हटले जाते असे मुख्यमंत्री म्हणतात, हे भाजपने जे पेरले तेच उगवले आहे. आणि हा डाव आता भाजपवरच उलटत आहे, असेही सपकाळ म्हणाले.




