आणखी १५ दिवस तरी सामान्यांसाठी मुंबई लोकल धावणार नाही- विजय वडेट्टीवार
मुंबई – लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं. विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा. लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागेल”
दरम्यान, दहावीच्या परीक्षावरुन कोर्टाने सरकारकडे विचारणा केली आहे. मात्र दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. दोन दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हातात काही राहिले नाही. केंद्र सरकारने कलम 102 निर्णय घेतला पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. कोर्टाने गायकवाड आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. हे तत्कालिन राज्य सरकारचे दुर्लक्ष म्हणावं लागेल. त्यांनी निवडणुकीच्या वेळी घाईगडबडीत निर्णय घेतला, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
चंद्रकांत पाटील भावनांशी खेळतात
सारथी संस्था सध्या माझ्याकडे नाही. अजितदादांनी या संस्थेच्या इमारतीसाठी 120 कोटी रुपये दिले. शिवाय 500 कोटी अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले आहेत. चंद्रकांत पाटील हे विरोधी आहेत. लोकांच्या भावनेशी ते खेळत राहणार म्हणजे ते चर्चित राहतील, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.