डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो मिरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार रुजू; परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून, मिरा भाईंदरवासियांसाच्या तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, सन 2009 मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या 14 वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील.
हेही वाचा – ईव्हीएमद्वारे निवडणूक, सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल, शुक्रवारी पुढील सुनावणी
तसेच एअरपोर्ट टी-1 वरून मेट्रो 3 चा वापर करून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील.त्याचबरोबर, नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे. दहिसर काशीमिरा मेट्रो डिसेंबर 2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे.
त्याबरोबरच वसई विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




