राज्यात उष्णेतेची लाट! हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
![Meteorological department has given orange alert to these districts](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/heatwave-1-780x470.jpg)
मुंबई : पावसाळा सुरू झाला तरी देखील राज्यातील बहुतांश भागात उष्णतेच्या झळा अद्यापही जाणवत आहेत. जून महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र राज्यात अजूनही पाऊस पडला नाही. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस प्रामुख्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
राज्यातील तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी अधिक आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे त्यामूळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा – अंकित बावनेने ठोकले MPL मधील पहिले शतक, ‘एक शतक दोन रेकॉर्ड’
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो आणि तापमान कमी होत असते. मात्र यंदा दमदार पाऊस न झाल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
पाऊस लांबण्याचे महत्वाचे कारण म्हणजे ‘बिपरजॅाय’ चक्रीवादळ आहे. बिपरजॅाय चक्रीवाळामुळे यंदाच्या वर्षांच्या मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून लांबल्यामुळे शेतीची कामे देखील खोळंबली आहे. आता हवामान खात्याने २३ जूननंतर मान्सून संपूर्ण राज्यात सक्रीय होईल अंदाज वर्तवला आहे. मात्र हवामान खात्याने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. जोपर्यंत ५० ते ६० टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी न करू नका असे सांगितले आहे.