भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सज्ज; ‘वॉर बुक’नुसार सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यभर सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवली असून, सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पोलीस, कोस्ट गार्ड आणि नौदल या सर्व सुरक्षा दलांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. नियमित सुरक्षा सराव करण्यात येत आहेत आणि कार्यपद्धती (SOP) ठरवण्यात आलेल्या आहेत. युद्ध परिस्थितीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या ‘वॉर बुक’नुसार आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.”
हेही वाचा – भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल स्थगित; BCCI चा मोठा निर्णय!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्यातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याचीही माहिती दिली. “राज्यातील अंतर्गत सुरक्षेची सखोलपणे समीक्षा करण्यात येणार असून, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत,” असेही ते म्हणाले.
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेली ही भूमिका राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी आहे. सुरक्षा यंत्रणांचा समन्वय, तसेच तत्परता लक्षात घेता, राज्य कोणतीही जोखीम उभी राहिल्यास सक्षमपणे तोंड देण्याच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे.