विशेष लेख: विश्वविजेता होण्याची भारताची कुवत आहे का?
![Is there a world champion, India, Kuwait?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/India-cricket-780x470.jpg)
ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आणि अजिंक्य पद मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या नियोजनबद्ध खेळापुढे भारतीय संघ सपशेल कोलमडला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/shalgaonkar.jpg)
ओव्हल च्या ढगाळ हवामानात हिरव्या खेळपट्टीवर रोहित शर्मा ने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी स्वीकारली.शमी आणि सिराज ने सुरवात तर चांगली केली पण नंतर सर्वच वेगवान गोलंदाजानी काहीसा आखूड मारा केला आणि काहीशा अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलिया चे काम सोप्पे केले. ट्रॅवीस हेड ने आक्रमक तर स्मिथ ने संयमी फलंदाजी करून दिवस अखेर ऑस्ट्रेलिया ला सुस्थितीत नेले.पहिल्या डावात साडे चारशे च्या वर धावा करून ऑस्ट्रेलिया ने सामन्याचा निकाल जवळपास तिथेच स्पष्ट केला होता.सुरवातीचा एक तास सोडला तर भारतीय गोलंदाजी पुर्ण प्रभावहीन होती. त्यात अश्विन ला वगळून एक जादा वेगवान गोलंदाज खेळवण्याचा रोहित चा निर्णय चुकला असे वाटले.
ICC स्पर्धेत निर्णायक सामन्यात अपयशाची भारतीय फलंदाजांची मालिका येथेही कायम राहिली.रोहित विराट शुभमन गिल पुजारा सगळेच स्वस्तात परतले.ऑस्ट्रेलियन गोलंदाजानी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून भारतीय फलंदाजना जखडून ठेवले.पुनरागमन करणारा रहाणे आणि त्याला तोलमोलाची साथ देणारे जडेजा आणि ठाकूर यांच्यामुळे भारताने तीनशेचा टप्पा गाठला.बोटाला दुखापत होऊनही तंत्रशुद्ध आणि जिगरबाज फलंदाजी चे प्रदर्शन रहाणे ने केले.
पहिल्या डावात दोनशे धावांची आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलिया ने दुसऱ्या डावात सावध फलंदाजी करून सामना भारताच्या आवाक्याबाहेर नेला.सर्वच फलंदाजानी उपयुक्त योगदान दिले आणि भारतासमोर साडे चारशे धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले.
चौथ्या डावात भारताने सुरवात तर चांगली केली पण शुभमन चा वादग्रस्त झेल आणि रोहित नी फेकलेली विकेट तसेच पुजारा चे अजून एक अपयश यामुळे भारत अडचणीत आला. विराट आणि रहाणे ने दिवस अखेर पर्यंत किल्ला लढवला आणि चाहत्याना अखेरच्या दिवशी चमत्काराची आशा दाखवली. पण अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया पुढं सपशेल लोटांगण घातले आणि चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरवले.
संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलिया नी सर्व बाबतीत भारताला निष्प्रभ केले तर भारतीय संघाचा खेळ आणि देहबोली नकारात्मक होती.वेगवान गोलंदाजानी हिरव्या खेळपट्टीवर आखूड मारा केला तर जडेजा पूर्णपणे प्रभावहीन होता.फलंदाजी मध्ये फक्त रहाणे ने किल्ला लढवला पण मोठी खेळी तो पण नाही करू शकला.रोहित विराट पुजारा पुन्हा अपयशी ठरले.पुजारा ला अजून किती दिवस पोसणार तसेच रोहित अजून किती दिवस धावा न करता खेळणार हा प्रश्नच आहे.विराट सुद्धा आश्वासक सुरवात करतोय पण मोठी खेळी नाही करते.आघाडीची फळीच अपयशी ठरली तर तुम्ही विश्वविजेते नाही बनू शकणार हे समजायला पाहिजे. घरच्या मैदानावर आखाड्यात परदेशीं संघाना चोपायचे आणि तटस्थ देशात जाऊन अंतिम फेरीत लोटांगण घालायचे याला काहीच अर्थ नाही. जुन्या अपयशी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या रक्ताला वाव देण्याची हिच वेळ आहे. तसेच घरच्या मैदानात गोलंदाज तसेच फलंदाजाना समान संधी असणाऱ्या खेळपट्ट्या बनवाव्या लागतील नाहीतर दर वेळेस तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल आणि चाहत्यांचा भ्रमनीरास होणार हे नक्की.