ऐन उन्हाळ्यात रंगाबादमध्ये पाणी प्रश्न पेटला, भाजपचं भांडी वाजवून आंदोलन
![In summer, water problem always flares up in Aurangabad, BJP's agitation by playing pots](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/In-summer-water-problem-always.png)
औरंगाबाद | उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं. अशातचं, ऐन उन्हाळ्यात औरंगाबाद शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सिडको भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने सिडको एन ५ येथील पाण्याच्या टाकीवर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन तासांपेक्षा अधिक वेळेपासून हे आंदोलन सुरू आहे. यावेळी तर निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या घरावर धडक दिली.
औरंगाबाद शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस असताना पाच ते सहा दिवस अनेक भागात पाणी येत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यातच पुंडलिकनगर टाकीवर महिलांनी पाण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सोमवारी भाजपने सिडको एन ५ येथील पाण्याच्या टाकीवर धडक देत आंदोलन केले. यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी निवेदन घेण्यासाठी येण्याची मागणी केली. मात्र, या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांनी आयुक्तांच्या घरावर मोर्चा वळवला.
डोक्यावर हंडा घेऊन घोषणाबाजी
भाजपकडून सिडको एन ५ येथील पाण्याच्या टाकीवर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी डोक्यावर हंडा घेत घोषणाबाजी केली. तर भांडी वाजवत, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, देत कसं नाही मिळायलाच पाहिजे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.