राज्यात पुढील १२ तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather | हवामान विभागाने राज्यात पुढील १२ तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात आज जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात १९ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, काल दुपारनंतर पावसाने जोर धरला, तर आज सकाळपासून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती आणि सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांलाही हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हेही वाचा – पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगडमधून अटक
राजधानी मुंबईत १८ आणि १९ जुलै यादिवशी अधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून कमाल ३१°C तर किमान २२°C तापमान असेल. विदर्भावर दुहेरी संकट आहे. इथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, उद्याही कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.