राज्यात अतिमुसळधार पाऊस, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-18-1-780x470.jpg)
maharashtra rain : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. सह्याद्री पर्वत रांगांच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच रविवार असल्यामुळे वर्षा पर्यटनालाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यांना धोकादायक परीस्थितीची वेळीच जाणीव करून देण्याचे एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पाणी पातळी वाढत आहे. सांगलीच्या बंधाऱ्यावर पाणी वाहू लागले आहे. तर बंधाऱ्या ठिकाणी धबधब्याचे स्वरूप आल्याने तरुण-तरुणी सेल्फी काढण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांच्याकडून मागणी होत आहे.
कुरुंदवाड, इचलकरंजी, पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी आले आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कुरुंदवाडला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील शिरडून गावाजवळील पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला आहे. सध्या ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने फिरवण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेल्यात आहेत. तसेच कर्नाटकलाही जोडणारे काही रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हेही वाचा – ‘प्रवीण दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता…’; मनोज जरांगे कडाडले
सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई ,कोरेगाव, कराड पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा सध्या 54 टीएमसी इतका झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पावसाची नोंद होत असते. मात्र, गतवर्षाच्या तुलनेने 100 मिलिमीटर पाऊस आजपर्यंत कमी प्रमाणात नोंद झाली आहे. 2023 मध्ये 21 जुलै रोजी महाबळेश्वर तालुक्यामध्ये 2420 मिलीमीटर पाऊस पडला होता मात्र त्याच्या तुलनेने 2024 ला 21 जुलै रोजी 2319 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
चंद्रपूरमधील अंधारी नदीच्या पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 लोकांना रेस्क्यू करुन काढण्यात आले. पोलिसांच्या रेस्क्यू टीमने पुराच्या पाण्यातून अजयपूर, हळदी, पिंपळखुट या भागातील लोकांना काढले. ते शेतात गेले होते. परंतु नदीला आलेल्या पुरामुळे अडकले होते. तसेच पिंपळखुट येथील रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधारी नदीच्या पुरामुळे चंद्रपूर-मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
नागपूर पिपला परिसरात सेंट पॉलशाळेजवळ उषा करवाडे नावाच्या महिलेचा मृतदेह मिळून आला. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसात ही महिला वाहून गेली होती. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटक्यामुळे ५ राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील 30 मार्ग बंद झाले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या संपर्क राज्यातील इतर भागांशी पूर्णपणे तुटलेला आहे. जिल्ह्यातील वैनगंगा गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, कटनी, दिना, पामुला, गौतमा, पर्लाकोटा अशा अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. या नद्यांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत शेतांमध्ये पुराचे पाणीच पाणी शिरले आहे. भामरागड तालुक्यातील ५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून या तालुक्यातील 100 गावे जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे संपर्काच्या बाहेर आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कोसारा पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी वाहत आल्याने वडकी वरोरा मार्ग बंद झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा हा वर्धा नदी असलेला कोसारा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद केली आहे.