गणेशोत्सव होणार गोड! यंदाही गणेशोत्सवात ‘आनंदाचा शिधा’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-18-2-780x470.jpg)
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील जनतेसाठी महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा यापूर्वीच केली आहे. जी राज्यातील कोट्यवधी कुटुंबांना लाभ देणारी आहे. आनंदाचा शिधा असे या योजनेचे नाव असून, ही योजना यंदा गौरी-गणपतीसाठी देखील लागू होणार आहे.
यापूर्वी दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढी पाडवा याबरोबरच इतर उत्सवांच्या निमित्ताने राबवली गेली आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा सणांचा आनंद द्विगुणित व्हावा, असा उद्देश सरकारचा आहे.
हेही वाचा – ‘विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार’; शरद पवारांचं आश्वासन
तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना या काळात होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा भार देखील कमी होण्यास उपयुक्त ठरणार आहे. या योजनेत समाविष्ट केलेले अन्नपदार्थ रवा, चणाडाळ, साखर आणि सोयाबीन तेल हे असून हे पौष्टिक आणि दैनंदिन आहारात महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत.
तसेच या अन्नपदार्थांचा समावेश करून राज्य सरकारने लोकांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले आहे. मागील दोन वर्षांपासून गौरी, गणपती, दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जात आहे. राज्यातील जनतेकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना यंदाही राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.