EVM विरोधात एकवटणाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज-मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/CM.jpg)
EVM मशीन मुळे भाजपाचा विजय झाला. ईव्हीएम मध्ये घोळ आहे असे म्हणत गळे काढणाऱ्यांना आणि याविरोधात एकवटणाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. वर्धा या ठिकाणी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपला पराभव का झाला? लोकांनी आपल्याला का नाकारलं? याचा विचार करा असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. विरोधकांची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.
एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीत युतीचा अभूतपूर्व विजय होईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु अशीही घोषणा त्यांनी केली. महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद ही आम्ही पाच वर्षात केलेल्या कामांची पोचपावती आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले सगळेच लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र आम्ही काहीजणांनाच प्रवेश दिला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.