निगडीतील नियोजित रस्त्यावर तब्बल 30 वर्षांपासून अतिक्रमण; चांगला रस्ता नसल्याने रहिवाशांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
महापालिकेचे पत्राशेड, टपर्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
![Nigdi, planned road, for almost 30 years, encroachment, lack of good road, inconvenience to residents, school students, Municipalities, letter sheds, wastes, encroachment, neglect,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/NIGDI-780x470.png)
पिंपरी:
निगडीतील, सेक्टर क्रमांक 24 येथील शिवम डेअरीजवळील गणपती मार्ग ते पुणे-मुंबई जुना महामार्ग हा मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात नियोजित रस्ता आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर अनधिकृत पत्राशेड, टपर्या व दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. तब्बल 30 वर्षांपासून हा रस्ता विकसित झालेला नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना आणि हजारो शालेय विद्यार्थ्यांना अरूंद व कच्च्या रस्त्यांवरून ये-जा करावी लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मात्र, येथे गेल्या 30 वर्षांपासून चांगला रस्ता नसल्याने नाईलास्तव या परिसरातील असंख्य हाऊसिंग सोसायट्यांतील रहिवाशांना तसेच, येथील विद्यानंद भवन हायस्कूलमधील हजारो विद्यार्थ्यांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचा मिळकतकर दरवर्षी प्रामाणिकपणे भरूनही अरूंद खड्डेमय व चिखलमय रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहेत. त्यामुळे या भागात लहान-मोठ्या दुर्घटना घडत आहेत.
मातीच्या या रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे चिखल व दलदल होते. या अरूंद रस्त्यावर वारंवार वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. नागरिक व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन बंब व रूग्णवाहिका या भागात पोहचू शकत नाही. परिणामी, मोठी वित्त व जिवीत हानी होण्याचा धोका वाढला आहे.
नियोजित रस्त्याच्या जागेवरील पत्राशेड, टपर्या व दुकानाचे अतिक्रमण हटवून महापालिकेने तातडीने रस्ता तयार करावा, अशी तक्रार परिसरातील अनेक हाऊसिंग सोसायट्या, सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशांनी यापूर्वी महापालिकेकडे अनेकदा केली आहे. मात्र, त्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप केला जात आहे.
अतिक्रमण करणार्यांसोबत महापालिका अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंध
रस्ता न करता अनधिकृत टपरी, पत्राशेड व दुकानदारांकडून हप्ते वसुल करण्यात महापालिकेच्या काही अधिकार्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे त्या अतिक्रमणावर कारवाई केली जात नाही. केवळ नोटीसा देऊन कागदे रंगविली जात आहेत, असा आरोप करून येथील रहिवाशी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित रहदारीसाठी पक्का डांबरी रस्ता बनवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आदम बेग यांनी केली आहे. अतिक्रमण हटवून रस्ता न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना दिला आहे.