ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार
नागपूर – मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असताना आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या पेटताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आता विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी राज्यात निवडणुका होऊन देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.
भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलना आधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी भाजपवर केली आहे. ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना संपेपर्यंत मुंबईची लोकल सुरू होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं नाही. केंद्रीय संस्था कशाप्रकारे वागत आहेत, हे दाखवण्यासाठी सरनाईक यांचे हे पत्र आहे. असं मला वाटतेय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.