#Coronolockdown:लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/Traffic-Police-3.jpg)
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते दोन मे या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 91 हजार 217 गुन्हे दाखल झाले आहेत. या दरम्यान 18 हजार 48 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी 25 लाख (3 कोटी 25 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात घरगुती अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीच राज्याचे गृहमंत्री यांनी घरगुती अत्याचारावरुन नागरिकांना इशारा दिला होता.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता उद्यापासून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू होईल. या लॉकडाऊनच्या काळात राज्यात 188 कलम लावण्यात आले आहे. राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 82,294 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 630 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवल्याची माहिती दिली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार 255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 51 हजार 719 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.