#CoronaVirus: वर्धा निवासी असलेला रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; कुटुंबातील पाच जण अलगीकरणात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/new-wardha-1.jpg)
प्रामुख्याने मुंबईतूनच करोनाची लागण होवून, वर्धा जिल्ह्यात अनेकजण वर्धा जिल्ह्यात दाखल झाल्याचे या अगोदर दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता वर्धा निवासी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला नागपुरातून करोनाची बाधा झाल्याची बाब धक्कादायी ठरली आहे. नागपूरवरून ये‑जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवेश परवानगीवर प्रश्नाचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
वर्धा शहरातील गजबजलेला भाग असलेल्या रामनगरातील ५९ वर्षीय व्यक्ती करोनाबाधित असल्याचा आज दुपारी अहवाल आला. १ जूनला ते वर्धेत आले होते. अजनी रेल्वेत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यास दोन दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्याने सेवाग्रामच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पॉझिटिव्ह अहवाल येताच त्यांच्या कुटूंबातील पाच व्यक्तींना सामान्य रूग्णालयात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, निवासी परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
या अगोदर सिंदीच्या रेल्वे कर्मचाऱ्यास बाधा झाल्याने त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. हे दोघेही रूग्ण परस्पराच्या संपर्कातील आहे. मात्र सिंदीच्या कर्मचाऱ्यापासून बाधा झाली की अजनीतून संसर्ग झाला, हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहे. आज या सोबतच वर्धमनेरी येथील पुरूष रूग्णाच्या संपर्कातील पत्नी आणि मुलीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सेवाग्रामच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. राज्यात सर्वात कमी रूग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात वाशिम पाठोपाठ असलेल्या वर्धेत प्रामुख्याने अन्य जिल्ह्यातून संसर्ग झालेले रूग्ण उपचारार्थ होते. तसेच वर्धेकर असणारे रूग्ण मुंबई, पूण्यातून लागण होवून आले होते. ८ मे रोजी हिवरा तांडा येथील महिलेचा झालेला मृत्यू १० तारखेला करोनाने झाल्याचे स्पष्ट झाले. ८ मे ते ८ जून दरम्यान केवळ १७ रूग्णांची नोंद होती. त्यापैकी ९ रूग्ण बरे होवून घरी परतले. धामणगावच्या युवतीचा वर्धेत मृत्यू झाला. मात्र तिच्या संपर्कातील अन्य नातलग सुखरूप परतले. तसेच वाशिमच्या रूग्णाचा वर्धेत मृत्यू झाला. एक जिल्ह्यातील व दोन अन्य जिल्ह्यातील असे तीन मृत्यू झालेत. त्या तुलनेत बरे होवून घरी परतण्याचे प्रमाण लक्षणीय राहल्याने जिल्हा सुरक्षित असल्याचे चित्र उमटले. मात्र अजनी रेल्वेत कार्यरत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना झालेली करोनाची लागण वर्धा जिल्ह्यासाठी धोकादायी समजल्या जात आहे.
सिंदीतला कर्मचारी अजनीत कार्यरत असतांना प्रवेश परवानगी घेवून आला होता काय? हे तपासल्या जात आहे. वर्धा‑नागपूर प्रवास करणारे कर्मचारी लक्षणीय संख्येत आहे. बहुतांश प्रवेश परवाना घेवून येतात. मात्र नागपूरच्या रूग्णांशी होणाऱ्या संपर्कातून करोना संसर्ग वाढण्याची चिंता प्रशासनासमोर उभी झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच जिल्हा मुख्यालयी व गजबजलेल्या भागात रूग्ण आढळून आल्याने वर्धा शहरात अस्वस्थता पसरली आहे.