महाराष्ट्रात उन्हाच्या पाऱ्याचे ‘चटके’; तर उत्तर भारतात थंडीने ‘हुडहुडी’
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
गेल्या काही दिवसापासून उत्तर भरतामध्ये तापमानात वाढ होत होती. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. त्यामुळे थंडी गायब झाल्याचे बोलले जात होते. काल रात्री दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका, उत्तम नगरसह अनेक भागात काल रात्री मुसळधार पावसासह गारपीट झाली. हवामानातील या बदलाची स्थिती भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवली होती. उत्तर भारताच्या काही भागांवर वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. त्यामुळे आज पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तसेच, या गडबडीमुळे नैऋत्येला वारे पुढे सरकतील. त्यामुळे आज ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारताच्या राज्यांवर ढगांचे आच्छादन राहू शकते. त्यामुळे पुढील 24 तासात येथे हवामान सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आज दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडूमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.