भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पराभवाचे खापर नवनीत राणा यांच्यावर फोडले
पराभूत 22 उमेदवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावती : अमरावती महानगर पालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. अमरावतीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपला अवघ्या 25 जागा मिळाल्या आहेत. मात्र मागील निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर आता 22 पराभूत उमेदवारांनी पराभवाचे खापर नवनीत राणा यांच्यावर फोडले आहे. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या. भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला असा आरोप या 22 उमेदवारांनी केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आले असून नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासीत करा अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.
22 उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आम्ही भाजपाचे निष्ठावंत, परिश्रम करणारे व समाजाशी नाळ जुळलेले उमेदवार होतो. या मनपा निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे तर भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी करून केला आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले असल्याने त्यांचे पक्षातून निष्कासन करण्यात यावे अशी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे.
नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचे गढ अनलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेल वर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्स वर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दयाव होता.
नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बनवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केलाः संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उत्तरल्या, भाजपाचे उमेदवार दमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला त्यामुळे पराभव झाला.
हेही वाचा : ‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; उदयोन्मुख सर्जनशील अर्थव्यवस्थेवर भर
नवनीत राणा काय म्हणाल्या?
यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, ‘ज्या उमेदवारांना निवडायचं होतं त्यांनाच लोकांनी निवडून दिलं आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपात थोडा घोळ झाला होता त्यामुळे जागा कमी निवडून आल्या ही माहिती भाजपच्या नेत्यांना आम्ही देणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या तिकिटा मिळाल्या असत्या तर 50 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते.
भाजप नेत्यांच्या आरोपावर बोलताना राणा म्हणाल्या की, ‘मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही, मी भाजपसाठी काम करते. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. जरी युवा स्वाभिमान वेगळी लढली तरी आमची यारी पक्की आहे आणि मैत्री ही पक्की आहे. जे लोक बोलतात त्यांना सोडून द्यावे लागते आपल्याला कामावर लक्ष करावे लागते.’




