मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार
![State Government files reconsideration petition in Supreme Court for Maratha reservation!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/cm-uddhav-thackeray-1.jpg)
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं समोर आलं होतं. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी पोलिस भरतीच्या तसेच अन्य परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागाने मराठा समाजासाठी आणि पद भरतीसाठी एक मध्यस्त मार्ग काढला आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार आहे. एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून ऐच्छिक स्वरूपाचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यातील 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला होता.
एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे तब्बल 13 हजार जागांसाठी भरती होणार आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील निर्णयामुळे भरती रखडली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा आणि 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे भरुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.