मुलगी झाल्याने रथातून मिरवणूक काढून अख्ख्या गावाला जिलेबी वाटली
![After giving birth to a girl, the whole village felt jilebi by removing the procession from the chariot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-22-at-07.19.53.jpeg)
सांगली – स्त्रीभ्रूण हत्या करून मातृत्वाला काळिमा फासणारे अनेकजण आज समाजात उजळ माथ्याने फिरताना दिसतात. मात्र अशीही काही कुटुंबे दिसून येतात की जी मुलीच्या जन्माची वाट पाहत असतात. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील ताटे कुटुंबीयातील नवदाम्पत्य अंजली ताटे आणि दिपक ताटे यांनाही कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे भारावलेल्या नवदाम्पत्याने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलगी मनस्वी हीचे जंगी स्वागत करून तिला रथातून मिरवून संपूर्ण बेडग गावाला जिलेबीचे मोठ्या उत्साहाने वाटप केले.
मुलगी किंवा मुलगा हा भेद न मानता या ताटे कुटुंबीयांनी संपूर्ण देशाला एक आदर्श घालून देण्याचे काम केले आहे. ताटे कुटुंबीयांच्या घरी १४ जुलै रोजी कन्यारत्न जन्मास आले. त्यानंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या कन्यारत्नाचे मनस्वी हे नामकरण करण्यात आले. आजोबा विजय ताटे आणि आजी सारीका ताटे यांनी मोठ्या आनंदाने नातीच्या प्रेमापोटी संपूर्ण बेडग गावाला जिलेबीचे वाटप करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी ही इच्छा नुकतीच पूर्णदेखील केली. कोरोनामुळे त्यांनी हा सोहळा लांबणीवर टाकला होता.