अडीच महिन्यात 35 कोटींची उलाढाल: नंदुरबार बाजार समितीत विक्रमी दीड लाख क्विंटल मिरची खरेदी
![35 crore turnover in two and a half months: record purchase of one and a half lakh quintals of chilli in Nandurbar Bazaar Committee](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Nandurbar-Chilly-731x470.png)
नंदुरबार ः गोंटुरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजार पेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या हंगामात बाजार समितीत विक्रमी दीड लाख क्विंटल मिरची खरेदी झाली आहे .हंगाम संपेपर्यंत तीन लाख क्विंटलचा टप्पा गाठला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अडीच महिन्यात मिरची विक्रीचा दीड लाख क्विंटलचा टप्पा पार केल्याने 35 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून यामुळे बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे.
जिल्ह्यात या वर्षी मिरचीच्या दरांनी उसळी घेतल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. मिरचीच्या दरात 500 रुपयांची घसघशीत वाढ झाल्यानं आता प्रति क्विंटल 2 हजार 500 ते 4 हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे दिसून आले. बाजारामध्ये यंदा लाली, व्हीएनआर, जरेल, फाफडा आणि शंकेश्वरी या वाणांना मोठी मागणी येत आहे.
या मिरचीची उशिरापर्यंत तोलाई सुरु असल्याचे दिसून आले. मिरची हंगाम तेजीत आल्याने शेतकरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नंदुरबार बाजार समितीच्या आवारात अनेक व्यापारी मिरचीची खरेदी करतात. जिल्ह्यातील विविध भागात लागवड केलेल्या मिरचीची अद्याप तोड सुरू असून यावर्षी आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असून मिरची घेऊन आलेल्या वाहनाच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत.