४० वर्षीय मुलाची आईविरोधात उच्च न्यायालयात धाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/court-hammer.jpg)
मुंबई | महाईन्यूज
दुसऱ्या विवाहासाठी दोन वर्षांचा असताना सोडून देणाऱ्या आणि नंतर मुलगा म्हणून स्वीकार करण्यासही नकार देणाऱ्या जन्मदात्या आईविरोधात एका ४० वर्षांच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. एवढेच नव्हे, तर आजीला कायदेशीर पालकत्व मिळेपर्यंत आपल्याला भिकाऱ्यासारखे जीवन जगण्यास भाग पाडल्यामुळे आई आणि तिच्या दुसऱ्या पतीला १.५ कोटीच्या नुकसानभरपाईचे आदेश देण्याची मागणीही त्याने केलेली आहे. न्यायालयाने सोमवारी याप्रकरणी आई आणि सावत्र पित्याला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
श्रीकांत सबनीस असे या याचिकाकर्त्यांचे नाव असून तो मेकअप आर्टिस्ट आहे. मुंबईसारख्या अनोळखी शहरात हेतूत: सोडून देऊन क्लेषदायक आणि मानसिक आघातांनी भरलेले जीवन जगण्यास भाग पाडल्याची जन्मदाती आई आणि तिचा दुसऱ्या पतीने नुकसानभरपाई द्यायला हवी, असे त्याने याचिकेत म्हटलेले आहे. याचिकेनुसार, आपले आई-वडील दोघे पुण्यात वास्तव्याला होते. फेब्रुवारी १९७९ मध्ये आपला जन्मही तिथेच झालेला होता. आपली आई खूप महत्त्वाकांक्षी होती आणि चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तिला मुंबईत यायचे होते. सप्टेंबर १९८१ मध्ये आपल्याला घेऊन तिने मुंबई गाठली होती. मुंबईत आल्यानंतर मात्र ती आपल्याला गाडीत सोडून निघून गेली होती. एका रेल्वे अधिकऱ्याला आपण सापडलो आणि कायद्यानुसार नंतर आपल्याला बालगृहात पाठवण्यात आले आहे.